हा प्रवास सुंदर आहे……

 

     'वाचन कट्टा'; वाचनसंस्कृती संवर्धानाचा 'अभंग' वारसा

अगोदर हैदराबाद संस्थानात आणि नंतर मराठवाडयात अनुक्रमे आ.कृ.वाघमारे आणि अनंतराव भालेराव यांनी ध्येयवादी पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली.सुधाकरराव डोईफोडे हे नंतरच्या पिढीचे प्रतिनिधी. सुधाकरराव डोईफोडे यांनी आपले मित्र  रामेश्वर बियाणी व डॉ.नंदकुमार देव यांच्या सहकार्याने 'प्रजावाणी' हे दैनिेक सुरु करुन पुढील काळात नावारुपाला आणले.आज हे दैनिक आपले हीरकमहोत्सवी वाटचाल करत आहे.

मराठवाडयात भूमिपत्र म्हणून ज्या दोन वृत्तपत्रांना समाजमान्यता मिळाली, त्यात एक होते 'मराठवाडा' आणि दुसरे 'प्रजावाणी' 'दिन-पीडितांना अंतर देऊ नये, जुलमी मंदांधंची गय करु नये' हे ब्रीदवाक्य या दैनिकाने सर्वार्थाने अंगिकारले.इतिहास, पराराष्ट्रसंबंध ,संरक्षण,भौगोलिक परिस्थिती आणि मराठवाडयाचे प्रश्न हे सुधाकरराव डोईफोडे यांचे आवडीचे विषय होते.यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले.गोविंदभाई श्रॉफ यांच्या नंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून सुधाकररावांचे नाव घ्यावे लागेल.रेल्वेप्रश्नावरही त्यांना विविध वृत्तपत्र व नियतकालिकांतून विपुल लेखन केले.'शब्दबाण' या त्यांच्या अग्रलेखांच्या संग्रहास शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.'परवड' व 'प्रतर्दनाचे दिवस' ही त्यांची पुस्तकेही दर्जेदार आहेत.आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुधाकरराव डोईफोडे 'नांदेड भूषण' सह अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले.

सुधाकर डोईफोडे, रामेश्वर बियाणी व डॉ.नंदकुमार देव यांच्या पश्चात 'प्रजावाणी' च्या संपादकपदाची तसेच व्यवस्थापनाची धुरा शंतनु सुधाकरराव डोईफोडे आणि गोर्वधन रामेश्वर बियाणी आपल्या इतर अनेक सहका-यांच्या मदतीने सांभाळत आहेत.

दै.'प्रजावाणी'ला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य्  साधून अनुजा शंतनु डोईफोडे आणि ॲड.दीपा गोवर्धन बियाणी या दोन मैत्रिणींनी १ जून २०१५ रोजी 'मानसी' या  पुरवणी ची सुरुवात केली. महिलांनी महिलांसाठी  सुरु केलेल्या या पुरवणीने महिलांना व्यक्त्‍ होण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाईम्स','सकाळ', 'लोकमत' इ. मोठया वृत्तपत्रांच्या धर्तीवर नांदेडसारख्या ठिकाणी प्रादेशिक वृत्तपत्राची महिलाविषयक पुरवणी काढणे धाडसाचे होते,पण अल्पावधीत 'दै.प्रजावाणी' च्या 'मानसी' पुरवणीला परिसरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. विविध विषयांना स्पर्श करीत पुरवणी दिवसेंदिवस परिपूर्ण आणि परिपक्व्‍ होते आहे.

समाजातील सर्व स्तरातील महिला लेखिका,कवयित्री या निमित्ताने लिहू लागल्या,त्यांच्या अभिव्यक्तीने 'मानसी' रुप निखरायला लागले.नवदुर्गां च्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणारी 'मानसी' ची विशेष् पुरवणी  ही दर्जेदार व वाचनीय होती.

'मानसी' तर्फे विविध समाजउपयोगी उपक्रमही राबविण्यांत येतात. मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी 'फुलवू या कळयांना' या अंतर्गत ५००० रुपयांची शिष्यावृत्ती दिली जाते.या कार्यात त्यांना नांदेडमधील दानशूर नागरिक मदत करतात.

जागतिक महिला दिनानिमित्ताने शहरातील जिल्हा रुग्णालय आणि विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालय,श्यामनगर व आयुर्वेदिक रुग्णालयातील परिचारिका व मेट्रन यांचा प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरव करण्यांत आला.

'एकल महिला प्रश्न्' हा 'मानसी' व्दारे सातत्याने पाठपुरावा करुन लावून धरला गेला.लोकसहभागाची अनिवार्यता लक्षात घेऊन अनेक मदतीचे हात या कार्याला जोडले गेले.सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुळकर्णी हे एकल महिला पुनर्वसन समितीने निमंत्रक आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कामकाज चालते.


'दैनिक प्रजावाणी-मानसी' व वनिता विकास ज्येष्ठ महिला नागरिक संघ यांच्या सहकार्याने १० एप्रिल २०२३ रोजी 'वाचन कट्टा' हा नवीन उपक्रम सुरु करण्यांत आला आहे.'दैनिक प्रजावाणीने' 'मानसी' च्या माध्यमांतून महिलांना लिहिते केले आणि आता महिलांनी व्यक्त्‍ व्हावे, यासाठी 'वाचन कट्टा'चे आयोजन करण्यांत येत आहे.महिलांमधे वाचनसंस्कृती रुजविणे हा यामागचा उद्देश आहे.प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या आठवडयांत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येते.पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील डॉ.हंसराज वैद्य्‍ यांच्या दवाखान्याच्या हॉल मधे सदर कार्यक्रम घेण्यांत येतो. अनुजा डोईफोडे आणि ॲड.दीपा बियाणी यांच्या सोबत डॉ.ज्योती डोईफोडे,निर्मलताई बा-हाळे,ज्योती चाटोरीकर या वनिता विकास व ज्येष्ठ नागरिेक संघाच्या पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रयत्नशील असतात.

'वाचन कट्टा' चे पहिले पुष्प् श्यामलाताई बोराळकर यांनी गुंफले.त्यांनी मराठवाडा मुक्तिसंगामाचे आद्यप्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे जीवनचरित्र आपल्या ओघवत्या व रसाळ वाणीने उलगडून दाखवले.या वेळी 'मानसी' च्या संपादक ॲड.दीपा बियाणी यांनी वाचनसंस्कृतीचे मह-त्व् विषद करुन,या उपक्रमा मागची भूमिका सांगितली.तसेच आजचा कार्यक्रम हा 'वाचन कटृा' उपक्रमाचे 'पहिले पुष्प्' झाले असे जाहीर केले.

     'वाचन कट्टा' चे दुसरे पुष्प् दि.५ मे २०२३ रोजी 'स्त्रीशक्ती' संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा किनगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यांत आले.'मला भावलेलं पुस्तक' या विषयावर मतमंथन झाले.निमंत्रितांपैकी ज्योती पिंपळवाडकर यांनी 'मायलेकी बापलेकी' या पुस्तकावर बोलतांना चांगल्या घरात बाप 'अर्धा आई' असतो. आणि आई 'अर्धी बाप' असते.तसेच मुलगी झाली की,बापाला घर लहान वाटतं आणि मुलीला घराचं अंगण कमी पडतं.अशा लेखक दासू वैद्य यांच्या विचारातील समर्पकता स्पष्ट केली.निमंत्रितातील दुस-या मान्यवर 'अभंग पुस्तकालया'च्या संचालिका नीमा कुळकर्णी यांनी साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकाचे मह-त्व समजावून सांगितले. पुस्तकातील स्वातंत्रयपुर्व कांळातील परिस्थिती व सद्यपरिस्थितीत तफावत असली तरी संस्काराचे मह-त्व् तितकेच आहे.शंभर वर्षापूर्वी सांगण्यात आलेली संस्कारमूल्ये कालातीत आहे.आदर्श जीवनाची मार्गदर्शिका म्हणून 'श्यामची आई' या पुस्तकाचा उल्लेख त्यांनी केला.आपल्या मुलांना संस्कारक्षम,संवेदनशील,बनवविण्यायाठी व मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी श्यामच्या आईचे अनुकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादनही नीमा कुळकर्णी यांनी केले.

'मला भावलेले पुस्तक' या विषयावर इच्छुक तीन महिलांमधे एक सौ.मंगलाताई जोंधळे यांनी 'ग्लेारी ऑफ द सन' या माईसाहेब आंबेडकर यांच्या अनुवादित पुस्तकावर आपले विचार मांडले.सहजीवन,जीवनाचा जोडीदार ,तत्कालीन सामाजिक परिस्थिती व प्रतिकुल सामाजिक परिस्थितीवर मात करणा-या माईसाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्रण सादर केले. दुस-या सौ.सुचित्रा पेन्सलवार यांनी 'रमाबाई रानडे' यांच्या सहजीवनातील आठवणी' या आत्मचरित्रावर प्रकाश टाकला.रमाबाई चां बालविवाह! कुटुंबातील परंपरावादी ज्येष्ठ मंडळी व पुरोगामी न्यायमूर्ती रानडे घरातील सा-यांचे मन सांभाळत केलेली तारेवरची कसरत,त्यांच्या गुणांची पारख करुन बहुआयामी व्यक्तिमत्व घडववणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जीवनपट ओखवत्या शैलीत मांडला.तिस-या इच्छुक महिला सौ.राजश्री मिरजकर यांनी दीर्घायुषी,निरोगी व आनंदी जीवनाचे जपानी रहस्य यावर आधारित 'इकिगाई' या प्रसाद ढापरे या अनुवादित पुस्तकावर आपले विचार मांडले.सुखी,निरामय जीवनाची गुरुकिल्ली आपणच आपले शिल्पकार कसे आहोत या संदर्भातील १० सुत्रे किती साधी,सोपी व सहज अंगीकारता येणारी आहेत हे सोप्या पध्दतीने सांगितले.

अध्यक्षीय समारोपात सुरेखा किनगांवकर यांनी 'मानसी' च्या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देत वाचनसंस्कृतीच्या विस्तरासाठी मोठीमोठी उपहारगृहे,बसथांबे,दवाखाने अशा सार्वजनिक ठिकाणी छोटीशी ग्रंथालये उभारावीत.या कार्यात स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे मत प्रदर्शित केले.महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भातील अनेक पुस्तकांचा उहापोह घेत भारतात महिला ब-याच प्रमाणात सुरक्षित असल्याचे सांगितले.

'मानसी' च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १ जून रोजी 'वाचन कटृा' चे तिसरे पुष्प संध्याछाया वृध्दाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली गुंफण्यांत आले.

'मला भावलेले पुस्तक' या विषयावर मतमंथन करण्यासाठी निमंत्रित अश्विनी मंठाळकर यांनी मुळ कन्न्ड लेखक उॉ.एस.एल.भैरप्पा 'आवरण' या उमा कुलकर्णी यांनी अनुवादित पुस्तकाचा आढावा घेतला.यातील स्त्री शोषण व सद्यस्थितीतील केरला स्टोरी,दिल्लीतील साक्षी प्रकरणाचे दाखले देत तरुणी व तरुणींच्या मातांना सजग केले.'चाणक्यनीती' या पुस्तकातील चाणक्य चे विचार प्रभावी पणे मांडले. निमंत्रितातील दुस-या वक्त्या डॉ.रमा नवले यांनी विश्वविख्यात फ्रेंच लेखिका सिमॉन व्हॉव लिखित 'सेंकड सेक्स' या अनुवसदित पुस्तकाचा (उपेक्षिता प्रस्तुती- डॉ.प्रभा खेतात ) आढावा घेतला.स्त्रीला स्त्री म्हणून घडवणे हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे उदाहरण आहे.स्त्री ने आत्मभान ,आत्मसन्मान,आत्मनिर्भरता याव्दारे व्यक्त व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

'मला भावलेले पुस्तक' या विषयावर इच्छुक महिलांमधे  नीता कुमठेकर यांनी 'बाणभटृ' या संस्कृत कादंबरीतील स्त्री व्यक्तिरेखेचे मार्मिक चित्रण केले.दुस-या इच्छुक महिला संगीता स्वामी यांनी कै.सुधाकरराव डोईफोडे यांच्या 'प्रतर्दनाचे दिवस' या पुस्तकाचा सविस्तर आढावा घेतला.हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच वेळी तत्कालीन रझाकारी राजवटीत महिलांचा होणारा अन्वनीत छळ,त्यांतून पेटून उठलेली क्रांतीकारक पिढी ,त्यांचा लढा याचे चित्रण केले.

अध्यक्षीय समारोपात सुरेखा पाटणी यांनी स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या व या उपक्रमात जास्तीत जास्त्‍ महिलांनी कृतीशील होत सर्व क्षेत्रात अग्रेसर व्हावे असे आवाहन पाटणी यांनी केले.

'वाचन कटृा' चौथे पुष्प् दि.९ जुलै रोजी  जिजाऊ बिग्रेड महिला संघटनेच्या अध्यक्षा डॉ.विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा गायत्री तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत संपन्न्‍ झाला. 'मला भावलेलं पुस्तक' या विषयावर समाजसेवक व साहित्यिक डॉ.हंसराज वैद्य यांनी आपल्या 'असाध्य्‍ ते साध्य्‍' या आत्म्चरित्रातील आपला संघर्षमय जीवनपट कथन केला.आपल्या जडणघडणीत आईची भूमिका विषद करतांना डॉ.वैद्य भावनिक झाले होते

'मला भावलेलं पुस्तक' या विषयांवर निमंत्रित वक्त्या संतसाहित्याच्या अभ्यासक,प्रवचनकार व किर्तनकार डॉ.वैशाली गोस्वामी यांनी आपल् 'श्री दिगंबरापर्णमस्तु' या पुस्तकावर विवेचन केले.१७ व्या शतकातील संतसाहित्याचे नवकोट नारायण अशा दासोपंताचे अनेक अज्ञात पैलू श्रोत्यांसमोर आणले.दासोपंताचे तत्वज्ञान, संगीत,नृत्य्,चित्रकला,कृषी, गोरक्ष,वाणिज्य्, राज्यशास्त्र,युध्दशास्त्र,वेद-उपनिषद,भगवदगीता विविधरंगी विषयावरील पैलूंचा उल्लेख करुन दासोपंताचे वेगळेपण श्रेष्ठत्व आपल्या रसाळ आणि ओवघवत्या शैलीत मांडले.संताच्या थोर परंपरेत दासोपंत दुर्लक्षित राहिले.त्यांचे साहित्य अज्ञात राहिल्याची खंत वैशाली ताईंनी बोलून दाखवली.दासोपंताच्या वंशज असलेल्या वैशाली ताईंनी आपल्या रसाळ वाणीने श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध केला.

ज्येष्ठ कवयित्री,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त् शिक्षिका आशाताई पैठणे यांनी किचन पोएम्स'या काव्यसंग्रहावर भाष्य केले.पुस्तकातील 'स्त्री मनाचा हळवा कोपरा' उलगडून दाखवणा-या कविता सादर केल्या.'किचन' हा स्त्रियांचा जिव्हाळयाचा विषय असतो.स्त्रीच्या आवडी-निवडी,तिच्या मनांतील सुप्त इच्छा,एकाकीपण,पतीच्या चेह-यामागचा दुसरा चेहरा, आयुष्यातील चढउतार या सा-यांचा आलेख पुस्तकातील कवितांच्या व्दारे कवीमनाच्या आशाताईंनी उलगद उलगडला.

सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीतां मधील गायत्री तोष्णीवाल यांनी महिला आत्मनिर्भर होण्यासाठी अशा महिलाविषयक उपक्रमांची आवश्यक्ता स्पष्ट केली. 'वाचन कटृा' च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोपात डॉ.विद्या पाटील यांनी 'वाचनकटृा' हे चालते बोलते ग्रंथालय असून त्यामुळे  महिलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातील.असा विश्वास व्यक्त केला.तसेच 'जिजाऊ चरित्र गाथा' या ग्रंथावर ओझरता प्रकाश टाकला.जिजामाता म्हणजे आदर्श माता ! सद्गुण,शौर्य आणि दूरदृष्टी साठी प्रसिध्द होत्या

'वाचन कटृा'च्या प्रत्येक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ॲड.दीपा बियाणी व अनुजा डोईफोडे परस्पर सहमतीने करतात.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मात्र वनिता विकास ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा डॉ.ज्योती डोईफोडे करतात.कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीपुजन व धार्मिक ग्रंथाच्या पुजनाने व सांगता पसायदानाने होते.

सुमारे १७ वर्षोंपूर्वी आम्ही (मी आणि माझे पती पत्रकार संजीव कुळकर्णी)'अभंग पुस्तकालयाची' स्थापना करुन वाचनसंस्कृती संवर्धन व संस्कृतिक चळवळ सुरु केली.

'अभंग' पुस्तकालयाने गेल्या १७ वर्षात केवळ ग्रंथविक्री हा सुंकुचित उद्देश ठेवला नाही. ग्रंथविक्री सोबतच साहित्य्, सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,सांगितीक,आरोग्य इ. विषयावर कधी व्याख्यान,तर कधी प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम,तर कविता वाचनाचा कार्यक्रम,नाटयप्रयोग अशा वैविध्य्‍पूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न्‍ केला. ग्रंथोत्सवासारखा अनोखा प्रयोगही केला.'श्यामची आई माझ्या घरी' हा अभिनव उपक्रम राबवला.'अभंग प्रकाशन' व्दारे अनेक दर्जेदार संदर्भग्रंथाची निर्मिती केली.नांदेडच्या रसिक श्रोत्यांचे चौफर सांस्कृतिक उन्न्यन करण्यांतूनच वाचनसंस्कृती जोपासली जाईल, असा विश्वास आम्हाला होता. अशा नाविन्यशील उपक्रमांमुळे ' अभंग ' ने आपले सांस्कृतिक क्षेत्रातले कृतिशील योगदान सिध्द केले आहे. नांदेडचे सांस्कृतिक वैभव वापस यायला सुरवात झाली.ज्येष्ठ पत्रकार व संपादक सुधाकरराव डोईफोडे यांनी 'अभंग' शिर्षकाच्या त्यांच्या अग्रलेखातही (दै.प्रजावाणी ) असेच म्हटले होते.

 नांदेड मधे वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्याची 'अभंग' ची परंपरा आता अनेक जण चालवित आहेत.या निमित्ताने साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे याचा आनंद आहे. आम्ही लावलेल्या एका पणतीने अनेक पणत्या पेटत आहेत. 'वाचणा-या समाजा' कडे घेवून जाण्याची ही नांदी आहे.

'दैनिक प्रजावाणी-मानसी' पुरवणी चा 'वाचन कटृा' अभंग पुस्ताकालयाचा वाचनसंस्कृती संवर्धनाचा वारसा समर्थपणे चालवण्याचा प्रयास करीत आहेत ही अत्यंत अनुकरणीय व अभिनंदनीय गोष्ट आहे.भविष्यात 'वाचन कटृा' कडून खूप दर्जेदार कार्यकमांची अपेक्षा आहे.

 संदर्भ :- मानसी पुरवणी,गुगल,सुधाकर डोईफोडे यांचे साहित्य्

  -  नीमा कुळकर्णी.

  -  भ्रमण ध्वनी :- ९९२३५९२२४७

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे……